वैभव भिकाजी चौगले यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...
schedule17 May 25 person by visibility 420 categoryकोल्हापूर

२५ मे रोजी कोल्हापूरात दिमाखदार कार्यक्रम
कोल्हापूर : दिव्या कांबळे
वैभव भिकाजी चौगले हे नाव केवळ शिक्षणाच्या क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक जाणिवेच्या विविध स्तरांवरही अत्यंत आदराने घेतले जाते. फार्माकोलॉजी आणि सायकोलॉजी मास्टर्स पूर्ण केलेल्या चौगले सर सध्या सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रमुख साधन आहे, या विश्वासाने त्यांनी गेली १५ वर्षे जीवशास्त्र (Biology) या विषयाचे कोचिंग क्लासेसमध्ये अध्यापन केले आहे. वैभव चौगले यांची समर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५ साठी निवड झाली आहे. रविवार २५ मे रोजी कोल्हापुरातील शाहुस्मारक सभागृहात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने वैभव चौगले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यांचे अध्यापन केवळ परीक्षेसाठी न राहता, विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय आणि पॅरामेडिकल शिक्षणाची ओढ निर्माण करून, अनेक सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शनाचा वसा घेतला आहे. मानसशास्त्राचा अभ्यासक म्हणून त्यांची भूमिका आणखीनच महत्त्वाची ठरते. शाळा, महाविद्यालय आणि अन्य शिक्षणसंस्थांमधून ते विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व समजावून देतात आणि त्यांना विनामूल्य मानसोपचार सेवा पुरवतात. आजच्या काळात ही गरज ओळखून, त्यांनी अनेक तरुणांचे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचे कार्य मनापासून पार पाडले आहे.
केवळ शैक्षणिक व मानसिक आरोग्य पुरते मर्यादित न राहता, सामाजिक जबाबदारीही ते तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडतात. वैकुंठ रथ या विनामूल्य शववाहिका सेवेचे एक महत्त्वाचे योगदानकर्ता म्हणून त्यांनी अनेक गरजू कुटुंबांना शेवटच्या क्षणांची मदत दिली आहे.
सन २००७ पासून ते "जाणीव फाऊंडेशन" संचलित "मनोबल व्यसनमुक्ती केंद्रा"शी सक्रियपणे जोडले गेले आहेत. येथे ते मद्यपानाच्या व्यसनातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या रुग्णांना समुपदेशन व मानसिक आधार देण्यासाठी कार्यरत आहेत. "मद्यपाश" या व्यसनरूपी आजारातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी अनेकांना नवजीवन दिले आहे.
वैभव चौगले सर हे आज एक आदर्श व्यक्तिमत्त्व ठरले आहेत, जे शिक्षण, मानसिक आरोग्य आणि सामाजिक कार्य या तिन्ही आघाड्यांवर अखंडपणे कार्यरत आहेत. सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील यशस्वी भरारीची दखल घेत त्यांची समर्थ फौंडेशन आणि दूर्गा फौंडेशन-जागर न्यूज यांच्या वतीने समर्थ महाराष्ट्र भूषण अवॉर्ड २०२५ साठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजात अनेक नवीन दिशा निर्माण होत आहेत. त्यांच्या योगदानाला मनःपूर्वक सलाम..!