कंपोस्ट खड्डा भरू आणि गाव स्वच्छ ठेवू अभियानाचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शुभारंभ...
schedule02 May 25 person by visibility 26 categoryकोल्हापूर

कोल्हापूर - आजच्या काळात प्रत्येकजण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आपण पाहत आहोत. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या उत्कर्षासाठी संकल्प करताना, घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता या महत्त्वाच्या विषयांना प्राथमिकता द्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, कोल्हापूर अंतर्गत स्वच्छ भारत मिशन टप्पा २ अंतर्गत भुदरगड पंचायत समितीच्या वतीने कुर गावात ‘कंपोस्ट खड्डा भरू आणि गाव स्वच्छ ठेवू’ या राज्यस्तरीय शाश्वत स्वच्छता उपक्रमाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला.
यावेळी पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परिट, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पंकज जाधव, गोकुळचे संचालक नंदकुमार डेंगे, सरपंच मदनदादा पाटील, माजी उपसभापती (पंचायत समिती भुदरगड) अजितदादा देसाई, उपसरपंच संदीप हळदकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, हे अभियान अधिक चांगल्या व प्रभावी पद्धतीने यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प करूया. आपल्या गावात, घरात, परड्यात, व्यवसायाच्या ठिकाणी याचा वापर करावा. यामध्ये स्वच्छतेचे सर्व मापदंड पूर्ण होतील. राज्यभर राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेऊन अशा प्रकारच्या प्रत्येक अभियानातून पुढे जाता येईल. स्वच्छतेसंबंधी प्रशिक्षण आयोजित करून जिथे चांगले काम झाले आहे, तिथे सहभागींना भेटी देण्यासाठी नेले जाऊ शकते.’
उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परिट यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, या अभियानाचा उद्देश म्हणजे गावातील शाश्वत घनकचरा व्यवस्थापन. नाडेप खड्डे आणि प्लास्टिक केज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सुविधा पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. सुका व ओला कचरा भरल्यानंतर १२० दिवसांत त्याचे खत तयार होते. हे खत शेतीसाठी उपयुक्त आहे. नाडेप कंपोस्ट व गांडूळ खत खड्ड्यांचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी हे अभियान अत्यंत उपयुक्त ठरेल. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत आजपासून या अभियानाची सुरुवात झाली आहे. घरच्या सुक्या व ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन घरच्या घरीच करता येते. अजितदादा देसाई यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘गावांमध्ये हॉटेल व्यवसायामधून मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण होतो. नाडेप सुविधेमुळे या कचऱ्याचे व्यवस्थापन प्रभावीपणे करता येईल.