हॉटेल साकोली – चविष्टतेची ३९ वर्षांची परंपरा...
schedule20 May 25 person by visibility 37 categoryकोल्हापूर

युवराज पाटील यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...
२५ मे रोजी कोल्हापूरात दिमाखदार कार्यक्रम
कोल्हापूर : दिव्या कांबळे
कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीत आपला स्वतंत्र ठसा उमठवणारे एक नाव म्हणजे हॉटेल साकोली. तब्बल १९८६ पासून, म्हणजे आज ३९ वर्षांपासून कोल्हापूरकरांच्या जिभेचे चोचले पुरवणारे हे हॉटेल म्हणजे स्वाद, दर्जा आणि माफक दर यांचे उत्तम समीकरण. युवराज पाटील यांची समर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५ साठी निवड झाली आहे. रविवार २५ मे रोजी कोल्हापुरातील शाहुस्मारक सभागृहात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने युवराज पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशस्वी प्रवासाची सुरुवात १५ ऑगस्ट १९८६ रोजी, श्री. हिंदुराव पाटील या सामान्य घरातील, पण मोठं स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने केली. त्या काळात "हॉटेल व्यवसाय" सुरु करणे हे सोपं नव्हतं—सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अडचणींना सामोरे जात त्यांनी साकोली कॉर्नर, कोल्हापूर येथे एका भाड्याच्या जागेत या व्यवसायाचा पाया रचला.
सकाळी चहा आणि नाश्ता, संध्याकाळी कोल्हापूरी मटण जेवण—अशा साध्या पण चविष्ट मेन्यूने सुरू झालेलं हॉटेल साकोली हळूहळू कोल्हापूरच्या खवय्यांचं आवडतं ठिकाण बनू लागलं. १९९७ साली, अनेक अडथळ्यांना पार करत त्यांनी स्वतःच्या जागेत रंकाळावेश स्टँडजवळ हे हॉटेल स्थायिक केलं.
हॉटेल साकोलीची खासियत म्हणजे खाद्यपदार्थांची गुणवत्ता अबाधित ठेवत, दर माफक ठेवणे. यामध्ये श्री. हिंदुराव पाटील यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यामुळेच हॉटेल साकोली हे नाव विश्वासार्हतेचे प्रतीक बनले. सामान्य ग्राहकांपासून ते खवय्यांपर्यंत, सगळ्यांच्या जिभेवर हॉटेल साकोलीचा स्वाद रुंजी घालतो.
आज हा व्यवसाय श्री. युवराज हिंदुराव पाटील यांच्याकडे आत्मीयतेने आणि जिद्दीने चालला आहे. वडिलांचा "गुणवत्ता आणि माफक दर" हा यशस्वी मंत्र त्यांनीही तितक्याच निष्ठेने पुढे चालवला आहे. विशेषतः लॉकडाऊन नंतर त्यांनी सुरू केलेली स्वस्तात मटण थाळी आणि चिकन थाळी ही कोल्हापूरच्या खवय्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाली.
हॉटेल साकोली ही केवळ एक खाद्यसंस्था नाही, तर कोल्हापूरच्या चविष्ट इतिहासाचा भाग बनली आहे. इथे येणारा प्रत्येक ग्राहक हा केवळ जेवायला येत नाही, तो परंपरेचा, चविष्टतेचा आणि घरगुतीपणाचा अनुभव घेऊन जातो. हॉटेल साकोली हे नाव आजही तेवढ्याच अभिमानाने घेतलं जातं कारण इथे मिळते ती माणुसकीची वागणूक, घरच्या जेवणाची चव, आणि खिशाला परवडणारी किंमत. ३९ वर्षांचा हा प्रवास म्हणजेच विश्वास, सातत्य, गुणवत्ता आणि कष्ट यांच्या यशस्वी गोष्टीचा स्वादिष्ट नमुना आहे.
त्यांच्या उद्योग क्षेत्रातील यशस्वी भरारीची दखल घेत त्यांची समर्थ फौंडेशन आणि दूर्गा फौंडेशन-जागर न्यूज यांच्या वतीने समर्थ महाराष्ट्र भूषण अवॉर्ड २०२५ साठी निवड करण्यात आली आहे. "हॉटेल साकोली – जिथे चव आहे, परंपरा आहे आणि प्रेम आहे..!"